एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..
काळजाचा ठाव घेत मनामनाला भावणारी..
रणरणत्या सिग्नलपाशी
थांबलेलं एक बालपण..
घासासाठी कोरभर करतं रोज वणवण..
इवलीशी पावलं.. रस्ताभर चटके..
चार आण्यांचा फुटला कप,
त्याला बारा आण्यांचे फटके..
नावामागे लावायला बापाचंही नाव नाही,
पाटी नाही, शाळा नाही, अक्षरांचा गाव नाही.
पोट भरायला शिकताना राहून जातं शिकणं,
भाळी येतं धक्के खाणं आणि पेपर विकणं..
हव्याहव्याशा सुखांचा जमत नाही थाट..
काही कळण्याआधीच लेकरू चुकतं वाट.
त्याला पडताना सावरणारी,
तो चुकला की कावणारी..
आयुष्याचा ध्रुव होऊन त्याला दिशा दावणारी..
एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..
माथ्यावरती अठराविश्वे दारिद्र्याचा शाप..
कितीही गाळला घाम तरी भरत नाही माप.
कर्जाची जू ओढत उपसत बसतो कष्ट..
सुखाचा एक ढगही साधा दिसत नाही स्पष्ट.
पोराचं शिक्षण.. पोरींची लग्नं..
घरदार पडलं गहाण, दुष्काळाचं विघ्न...
आभाळभर दाटतात मग हे विषारी प्रश्न.
कुठून आणावं आता सुख मागून उसनं?
जड जायला लागतो रोज ताटातला घास..
पिंपळाशी वाट बघतो.. लोंबणारा फास.
परिस्थितीच्या वादळात
जिद्दीचं पीक लावणारी..
No comments:
Post a Comment